पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी पुणे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनिता वाडेकर, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर महिलाध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सुनीता वाघमारे, मीना गालटे, मोहन जगताप, किरण भालेराव, अतुल भालेराव, रमेश टेलवडे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, माणिक माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक कांबळे म्हणाले, ‘आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवलेंनी काम केले आहे. पक्षातर्फे त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे.’
बाळासाहेब जानराव म्हणाले, ‘संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आठवले कायम सजग असतात. समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो.’
परशुराम वाडेकर म्हणाले, ‘रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. आता त्यांना चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे.’
‘रामदास आठवले तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.